Tuesday, March 24, 2020

गेली कुठे फुले ही?

गेली कुठे फुले ही? 
डॉ. शंतनू अभ्यंकर  

त्या व्हिएतनामच्या ‘मदर’ने आणि एकूणच त्या संग्रहालयाने  भारावून जावून मी तिथल्या संचालकांना भेटायला गेलो. माझ्या मनातला पहिला  प्रश्न मी विचारला, ‘हे इतकं  भयानक संग्रहालय तुम्ही मुलांसाठी का खुलं ठेवलंय?’ 
‘मुलं वहावत जाऊ नयेत, युद्धविरोधी मतं त्यांनी लक्षात घ्यावीत म्हणून.’ ते उत्तरले. वर म्हणाले अहो भारतातले ना तुम्ही?  मग महाभारत हे तर  जगातलं एक आदी युद्धविरोधी महाकाव्य आहे. 

किती खरं होतं त्यांचं म्हणणं; कुरुक्षेत्रावरच्या नरसंहारानंतर, कौरवांचा  वंशविच्छेद होतो, पांडवांच्या पदरी पडतं ते युद्धजर्जर राज्य. पांडवांचेही बहुतेक आप्तस्वकीय मारले जातात. जिंकून घेतलेलं राज्य उपभोगायची उमेद त्यांना रहातच नाही. लवकरच सन्यास घेतात ते.  उत्तर महाभारताच हा शोकात्म शेवट कितीतरी साहित्यकृतींचा विषय आहे. भासाचे ‘ऊरुभंगम्’, विद्याधर पुंडलिकांची ‘चक्र’ (एकांकिका) आणि मतकरींचे ‘आरण्यक’ ही सहज आठवलेली उदाहरणे.     

युद्धबळी डायरेक्ट स्वर्गात जातात असं सर्व संस्कृती  मानतात. ते सहाजीकच आहे. लढायला जावून प्राणांची बाजी लावायला आमिषही तसंच पाहिजे. पण सर्वसंहारक युद्धाचा थेट दाहक अनुभव, महाराष्ट्रभूमीला अलीकडे तरी नाहीच. त्यामुळे की काय  इथे पोवाड्यांचे आणि समरगीतांचे  पीक अमाप. युद्धविरोधी लिखाण शोधूनही सापडणार नाही. 

पण इंग्लंड-अमेरिकेनी जगभर युद्धे केली, त्यातली कित्येक त्यांनी जिंकली आणि कित्येक पार हरली सुद्धा. त्यामुळे युद्धाकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टीकोन आपल्यापेक्षा वेगळा आहे. निदान काही  लोकांचा तरी. युद्धविरोध म्हणजे थेट  देशद्रोहच ठरावा  असं राज्यकर्त्यांनाही  बरेचदा वाटतं.  पण जनतेला मात्र नाही. निष्फळ व्हिएतनाम युद्धाविरोधात तर अमेरिकेत  मोठी चळवळ उभी राहिली.  

त्यातूनच युद्धविरोधी साहित्य असा वेगळा प्रकार आणखी फोफावला. यात कथा, कविता यांची रेलचेल आहे. युद्धाची रोमॅंटिक कल्पना उद्ध्वस्त करणारं, हौताम्याभोवतीचं नाहक वलय विझवून टाकणारं, युद्धाचं रखरखीत वास्तव रोखठोकपणे मांडणारं हे साहित्य. अर्थात काही लेखकांना राजकीय पोळी भाजायची होती पण बरेचसे स्वतः पोळले होते, युद्धातील  वैयर्थ त्यांच्या लक्षात आले होते  आणि एकूणच शांततावादी असे त्यांचे विचार त्यांनी जोरकसपणे मांडले. पण युद्धाला पर्याय कुणालाच सुचवता  आलेला नाही. 

मग मला  पीट सीगरचं गाणं आठवलं. (Where have all the flowers gone?) मग तिथेच बसून स्वैर भाषांतर केलं. मनाचा ठाव घेणारं गाणं. एखाद्या लोकगीतांची चाल आणि हृदयस्पर्शी शब्द. संपत संपत गाणं पुन्हा मूळ पदावर येतं आणि जणू एक विचारवर्तुळ पूर्ण होतं. कापुसकोंड्याच्या गोष्टीसारखी युद्ध ही सुद्धा एक न संपणारी गोष्ट आहे, असं तऱ् सुचवत नाही ना  हे गाणं...? 
 
गेली कुठे फुले ही? केंव्हाचा बहरच नाही 
गेली कुठे फुले ही?
तोडली मुलींनी सारी; 
शिकणार कधी मुली या?  कधी या होणार मोठ्या? 

गेल्या कुठे मुली  ह्या? केंव्हाच्या दिसल्या नाही?
गेल्या कुठे मुली  ह्या? 
पोरांनी जवान साऱ्या; साऱ्या करून नेल्या 
शिकतील कधी मुली या?  कधी या होणार मोठ्या? 
शिकतील कधी मुली या?  

दिसेनात कुठेही पोरे? केंव्हाची  गेली  असती...! 
दिसेनात कुठेही पोरे?
तळहाती घेऊन प्राण, गेली सीमेवरी लढाया, नेली सीमेवरी लढाया!
शिकतील कधी मुले ही, होतील कधी ही मोठी? 
शिकतील कधी मुले ही? 

गेले कुठे जवान? केंव्हाचे नाही आले? 
गेले कुठे जवान? 
गेले! दफनही झाले. 
शिकतील कधी मुले ही, होतील कधी ही मोठी? 

दफनभूही दिसेना, केंव्हाचा चालू शोध... 
दफनभूही दिसेना. 
आच्छादली फुलांनी, ही पुढ्यात दफनभूमी 
शिकणार कधी आम्ही? मोठे होणार कधी आम्ही?  
गेली कुठे फुले ही? केंव्हाचा बहरच नाही 
गेली कुठे फुले ही?

Sunday, March 15, 2020

व्हिएतनामची मदर

व्हिएटनामची ‘मदर’ 
डॉ. शंतनू अभ्यंकर 

अश्रू म्हटलं की मराठी माणसाला आई आठवते. साने गुरुजींच्या शामच्या आईनं काही पिढ्यांवर गारुड केलं आहे. आई म्हटलं की कसली सोज्वळ आणि भावुक होतात माणसं. पण ‘आई’ नावाच्या शिल्पाने अंतर्बाह्य ढवळून निघल्याचा अनुभव  मला आला तो व्हिएतनाममध्ये. तिथल्या युद्ध-संग्रहालयात.
तब्बल वीस वर्ष चाललेलं हे युद्ध (१९५५-७५). शेवटी इथे अमेरिकेला माघार घ्यावी लागली. व्हिएतनामचा विजय झाला, पण व्हिएतनामलाही काही कमी भोगावं लागलं नाही. युद्ध हरण्या खालोखाल  काही वाईट असेल, तर ते युद्ध जिंकणे होय. व्हिएतनामला याचा पुरेपूर प्रत्यय आला. 

युद्धाचं  उघडंवाघडं,  भीषण वास्तव, खुलेआम मांडणारं हे युद्ध संग्रहालय. छिन्न चेहरे, विच्छिन्न  शरीरे, छिन्नमनस्क  जनता आणि नापाम बॉम्बने विद्रूप झालेल्या पिढ्याचपिढ्या. ‘एजंट ऑरेंज’ने (एक रासायनिक अस्त्र) उजाड केलेली शेती, वैराण भातखाचरे,  केळीचे सुकलेले बाग, उघडे ताड  आणि बोडके माड. एकेक दालन पार करता करता किती वेळा अंगावर सरसरून काटा येतो. उभ्याउभ्या दरदरून  घाम फुटतो. डोळे गप्पकन्  मिटून आपण जिथल्यातिथे थिजून जातो. हे क्रौर्य आपल्याला  पहावत सुद्धा नाही तर  ज्यांना भोगवं लागलं, त्यांना काय यातना झाल्या असतील; या विचारानी आपण अस्वस्थ होतो.  कोणीही सहृदय माणूस हे संग्रहालय एका झटक्यात पाहुच शकत नाही. थोडा वेळ दालनाबाहेर बसायचं पुन्हा हिम्मत गोल करायची आणि आत  शिरायचं असं करावं लागतं. युद्धस्य फक्त  कथाच  रम्या, वास्तव किती हादरवून सोडणारं असतं ह्याचं यथार्थ दर्शन इथे घडतं.
तिथे  एक ओबडधोबड पुतळा आहे. ‘मदर’ नावाचा.  सात आठ फुट उंचीचा. नाव ‘आई’ असलं तरी मुळात तो बाईचा पुतळा आहे हेही  सांगावं  लागतं. बाईपणाचं आणि आईपणाचं कोणतंच लेणं तिच्या अंगाखांद्यावर नाही. ना आसपास खेळणारी चार दोन गोजिरवाणी पोरं, ना थानाला  लुचलेलं एखादं  पदराआडचं पिल्लू. मुळात तिला थानंच नाहीत. छातीच्या फासळ्याच  तेवढ्या दिसताहेत.  अस्थिपंजर   झालेलं शरीर, त्याला कसलीही गोलाई नाही. तोंड खप्पड, त्यावर ना वात्सल्य, ना प्रेम, ना करूणा,  ना काही. आईपणाशी निगडित कोणतीही भावना नाही त्या चेहऱ्यावर. चेहरा कसला जवळजवळ कवटीच, म्हणायची इतका भेसूर. ही कसली ‘आई’ ही तर बाई सुद्धा नाही. शिवाय ही उभी आहे जमिनीतून निवडुंगासारख्या फुटलेल्या काही पोलादी पट्यांमध्ये. कमळात वगैरे उभी असल्यासारखी. पण हिच्या हातातून मोहरा वगैरे काही पडत नाहीयेत. हिचे हात तर नुसते दोन्ही बाजूला लोंबताहेत, जीव नसल्यासारखे. काही देणं तर सोडाच पण काही मागायचंही त्राण त्यांच्यात नाही. 
ज्ञूएंग होयांग हुय अशा काही तरी नावाच्या कलाकाराची ही कृती. नाव ‘मदर’ दिलंय म्हणून, नाहीतर मम्मी ऐवजी इजिप्त्शियन ‘ममी’ म्हणून खपलं  असतं  हे शिल्प. पण ह्या कलाकृतीची पार्श्वभूमी लक्षात येताच हे शिल्प आपल्याला हादरवून सोडतं. 
युद्धग्रस्त, उद्ध्वस्त, व्हिएतनाममधील ही ‘मदर’ आहे. हीचं  सर्वस्वं  लुटलं गेलं आहे. बेघर, निराधार, निरापत्य अशी ही आई आहे. म्हणजे कधीतरी ती  आई होती. आता तिची मुलं नाहीत. ती बहुधा युद्धात मारली गेली. आता हिला घर नाही ते बहुधा युद्धात ध्वस्त झालं. आता हिला शेतीवाडी नाही, म्हणजे असेलही जमिनीचा तुकडा, पण नापाम बॉम्बच्या रासायनिक माऱ्यात तिथलं पीक झालंय निष्प्राण  आणि जमीन आता कायमची नापीक. 
हे आर्त साकार करण्यासाठी मग कलाकाराने बॉम्बच्याच कपच्या वापरल्या आहेत. ह्या कपच्यांच्याच  कमळ-पसाऱ्यात ती उभी आहे, ह्या कपच्यांनीच ती बनली आहे. ज्यामुळे ती उद्ध्वस्त झाली त्या बॉम्बच्या तुकड्या तुकड्यांनीच ती आता घडली आहे. आपल्या रयाहीन, पोकळ, वठल्या शरीरातून पहाणाऱ्याचा अंत पहाते  आहे.

Sunday, March 8, 2020

मोक्षमार्ग

मोक्षमार्ग 
डॉ. शंतनू अभ्यंकर 

मोक्षप्राप्तीचे सुख तसेे अनेक ठिकाणी लपलेले असते. 
निसर्गात तर हे सुख वारंवार. उत्तुंग शिखराच्या पायथ्याशी येणारे इवलेपण, अथांग सागराच्या किनाऱ्याशी उरी जागणारी गूढ जिज्ञासा, आकाशगंगेच्या दर्शनमात्रे फुलणारी गात्रे, असे सारे क्षण विलक्षण खरेच. तो तो क्षण  मनात कायमचा  कोरलेला. नुसत्या आठवानेही थरारून टाकणारा.  कोणत्याही अननुभूत सौंदर्याचा अनुभव हा मोक्षपदी  पोहोचवणाराच असतो. मोक्षाचे मार्ग अनेक.
पण निव्वळ सौंदर्याच्या भव्योत्कट     दर्शनाने,  नकळत, अलिप्तता उन्मळून पडावी आणि अनावर आनंदाअश्रूंचे  झरे फुटावेत असं खूप खूप क्वचित होतं. असा एक क्षण मला गवसला दार्जिलिंगला. तिथला  सूर्योदय हा एक खास सौंदर्यानुभव. 
इथे पश्चिमेकडे तोंड करून सूर्योदय बघायचा असतो. म्हणजे सूर्य पूर्वेलाच उगवतो पण आपण बघत रहायचं पश्चिमेला. कारण पश्चिम क्षितिजावरच्या पर्वतराजीतील कांचनगंगेचे शिखर सूर्योदय होताच सर्वप्रथम दीप्तिमान होते. आणि ते दृश्य अद्भुत असते. 
पहाटे चारलाच उठावं  लागतं. सुरवातीला मिट्ट  काळोख असतो. काहीच दिसत नाही. आणि तो  क्षण येतो.  भुरकट, धुरकट क्षितिजाच्या झिरझिरीत, अस्पष्ट, पडद्याआड ठिणगी पडावी आणि विझूच  नये असा एक प्रकाशबिंदु अचानक लकाकतो आणि आपल्या काळजाची तार छेडून जातो. पूर्वक्षितिजावर तेजोनिधीच्या पावलाची ही पहिली पश्चिमचाहूल. हे किरण कांचनगंगेच्या शिखराला स्पर्श करतात, तो  क्षण अविस्मरणीय. दुसऱ्याच क्षणी तो ठिपका विस्तारतो, जणू विजेचा लोळ होतो  आणि  त्या हिमपर्वताच्या कडांवर  गडद केशरी निऑनच्या झगमगत्या नळयांची आरास उमटते. हा  तेज:पुंज  दिव्य क्षण आपण अनुभवेपर्यंत  तो प्रकाश लखलखत्या रेशीमधारा होऊन शिखरावरुन  खाली ओघळू लागतो आणि  कांचनगंगेच्या कडेकपाऱ्या  आपल्या परिसस्पर्शाने झळाळून टाकतो. हळूहळू मलमली पडद्याआड आसपासची शिखरे  उजळू लागतात. तीही  क्षणभर ही प्रकाशशलाका  अंगाखांद्यावर खेळवतात आणि पुढच्याच क्षणी त्या स्वर्गीय प्रकाशात न्हाऊन निघतात. सुर्वणरसाचा अभिषेक करावा तसा  हा  प्रकाशाचा लाव्हा वहात वहात जातो. आपण शहारून जातो ते निव्वळ थंडीने नाही. 
इतक्यात आपल्यापासून ते त्या शिखरांपर्यंत  गुबगुबीत गालिचा अंथरलेला असावा तसे ढगांचे पुंजके दृष्यमान होतात. असं वाटतं की या पायघड्यांवरुन  गेलो तर  त्या  शिखराशी सहज पोहोचू आपण. क्षणात गुलाबी तर  क्षणात सोनेरी प्रभा त्या ढगात खेळू लागते. विजेच्या वेगाने समोरचे रंग बदलत रहातात. आपण दंग होऊन जातो. ते ढग खूप खूप  खाली, खोल दरीत  असतात आणि आपण असतो आकाशाच्या कुशीत. 
वर नजर जाताच मघाशी सुवर्णरसानी ओथंबलेली शिखरे आता स्वच्छ उन्हात, शुभ्र चांदीची चमचम ल्यालेली दिसतात. हिमालयाचा हेमालय आणि हेमालयाचा रजताद्री असा नजरबंदीचा हा खेळ.
उन्हे वर येतात. अचानक एक कोवळी तिरीप आपल्या अंगाला स्पर्श करते. हा तमसो मा ज्योतिर्गमयी   खेळ  याची डोळा बघितल्याची लोभस जाणीव, याची देही करून देतात. त्या उन्हात उजळलेल्या धुक्याच्या कणांत आपल्याला आपणच दिसायला लागतो. पृथ्वी नावाच्या ह्या वेटोळ्या गोळ्याच्या काठावर असा खेळ अव्याहत चालू असणारा. आणि ह्यापेक्षाही कित्येक पट असे कोट्यवधी सूर्य, त्यांचे त्याहून अधिक  ग्रहगोलक. त्यांची उत्पत्ती, स्थिति, गती आणि लय निर्हेतुकपणे चालूच. पण या साऱ्यात आनंद शोधणारं, साऱ्यात हेतू शोधणारं मानवी मन.     ब्रम्हांडसोहोळ्याची ही सारी  लीला मला असह्य  होते. कोणती पुण्ये अशी आली फळाला, असा प्रश्न पडतो.
एवढे सुख सहन करणं माझ्या शक्तीपलीकडे असतं. नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हे नेमके आनंदाश्रू की आणखी काही हे सांगता येत नाही. मोक्ष मोक्ष म्हणतात तो हाच असावा बहुतेक.