Saturday, February 22, 2020

५ शेंड्यांचं दुकान बंद झालं


शेंड्यांच दुकान बंद झालं!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

ते असो, मी काय सांगत होतो, संस्कृती प्रवाही असते... ह्या प्रवाहात झाडे तर जातातच पण लव्हाळीही रहातील की नाही सांगता येत नाही. आता हेच बघा ना...  
‘शेंड्यांच दुकान बंद झालं!’
‘म्हणजे?’
‘म्हणजे कायमचं बंद झालं.’
‘शेंडे रिटायर झालेत!’
‘ऑ!’
‘त्यांना काय झालं रिटायर व्हायला?’
‘झालं काही नाही, फक्त वय झालं.’
‘च्यामारी, आता आम्ही चौकात चहासाठी कुणाकडे जायचं?...आणि दुकानाची भाड्याची  जागा?’
‘ती कृष्णाबाई संस्थानची होती. शेंड्यांनी ती कुठलीही अपेक्षा न करता परत केली!!’
‘ऑ!!’
हे संवाद सध्या वाईत घरोघरी झडत आहेत.
सतीश शेंड्यांचं हे चहाचं, म्हणजे चहाची पावडर मिळण्याचं दुकान. पण मालकांचं अगत्य एवढं की शेजारच्या चहा-टपरीवाल्याची सतत भरभराट होत गेली!
शेंड्यांचं दुकान गेली कित्येक वर्ष चौकात ठाण मांडून आहे. चहाचं म्हणून सुरु झालेलं दुकान, मग त्याचं विस्तारित रूप, मग आगीत भस्मीभूत झालेलं दुकान, मग त्याच फिनिक्ससारखं राखेतून नव्या रुपात उभे रहाणं हे सगळ तमाम वाईकरांच्या परिचयाचं आहे. हे परिचयाचं आहे तसंच सतीश शेंड्यांची काउंटरपलीकडून येणारी दणदणीत हाळीही परिचयाची आहे. येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला अगत्यानी दुकानात बोलावणार, चार इकडच्या तिकडच्या गप्पा मारणार; त्याच वेळी आलेल्या गिऱ्हाइकाला हवं-नको पहाणे, नोकर माणसांना सतत सूचना देणे, पैसे देणे-घेणे, मालाची यादी बनवणे अशी एका वेळी दहा हात असल्यागत शेंड्यांची कामे चालू असणार. मग, ‘चला येतो आता.’ असं म्हटलं की शेंडे  म्हणणार, ‘थांब रे, चहा सांगितलाय. आत्ता येईल.’
गप्पांच्या ओघात खाणाखुणा करून शेंड्यांनी पलीकडच्या च्यावाल्याला केंव्हाच चहाची ऑर्डर दिलेली असायची. मग खास टपरीवरचा तो च्या, घोटा दोन घोटात संपवून आपण बाहेर पडायचं. पण पाउल बाहेर पडतापडता शेंडे पुन्हा हाक मारणार आणि सुवाच्य अक्षरात लिहिलेला  कागदाचा पाठकोरा चतकोर समोर धरणार. मघाशी जी मालाची यादी म्हणून आपण समजलो ती मालाची यादी नसून, ती असणार पुढच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीची चेकलिस्ट!!!
ही शेंड्यांची खासियत. प्लॅनिंग जबरदस्त. प्रत्येक गोष्टीची यादी. कार्यक्रम कोणताही असो. मंत्र्यासंत्र्यांच्या उपस्थितीतील एखादा बडा समारंभ असो वा चार टाळकी तरी जमतील की नाही अशी शंका असणारा, छोटेखानी कथाकथनाचा असो, याद्या तयार. मित्र म्हणणार, नारळ प्रमुख पाहुण्यांच्या हातात कोण देणार...आणि तो देणाऱ्याच्या हातात तो कोण देणार.. इथपर्यंत याद्या! पण शेंडे अशा चेष्टेने डगमगत नाहीत. आपला वसा टाकत नाहीत.
शेंडे दुकानात बसून गावच्या संस्कृतीची काळजी वहाणार. प्रतिक थिएटर   आणि संस्कार भारतीसाठी  हजार उठाठेवी करणार.  दुकानाबाहेर चक्क एक स्मृतीस्तंभ घडलेला. दिनविशेषानुसार त्यावर थोरामोठ्यांची प्रतिमा ठेवलेली. मग कधी प्रतिमापूजन वगैरे असा खास कार्यक्रम. शेंड्यांच्या दुकानात निव्वळ खरेदीला फारच थोडे लोक जाणार. बहुतेक जाणार ते सांस्कृतिक समृद्धीसाठी. म्हणूनच दुकान बंद म्हटलं की रुखरुख वाटू लागते.
शेंडे भेटले की विचारणार आहे मी आता, ‘अहो आता आम्ही चहाला कुठ जायचं?’ पण त्यांचं उत्तर मला आत्त्ताच ठाऊक आहे, ‘म्हणजे? आता चहाला घरी यायचं!’
...आणि अगदी अस्सच झालं, मी सवाल करताच त्यांचा जवाब आला, ‘म्हणजे? आता चहाला घरी यायचं! त्या निमित्तानी तू घरी येशील आणि चहा बरोबर पोहेही खाशील!!’



७ चहा आणि चहाते


चहा आणि  चहाते
डॉ. शंतनू अभ्यंकर

शिवाय चाहत्यांचे जेवढे रंगढंग तेवढेच चहाचेसुद्धा. साधा चहा, स्पेशल चहा, ‘पेशल’ चहा, इराण्याचा, कटींग, मारामारी असे अनेक प्रकार.  शुद्ध दुधाचा चहा आहे, बिनदुधाचा चहा आहे, साखरेचा आहे, बिन साखरेचा आहे, गुळाचा आहे. कसले कसले मसाले घातलेला चहा आहे  इतकंच काय  मुळात दुसरीच  कुठली तरी  ‘कीस झाड की पत्ती’  घातलेला, असा बिनचहापत्तीचाही  चहा आहे.   गोरा, काळा, हिरवा असा विविधरंगी आहे.  खारट, आंबट, तिखट, तुरट  अशा अनवट चवीचा आहे.  करपलेला, धुरकटलेला अशा नकोशा वासाचा आहे. खळखळ उकळता चहा  पिणारे आहेत.  ओट्यावरून टेबलावर येईपर्यंत  ‘गार झाला’ म्हणणारे आहेत. ‘आता तोंडात गाळू का?’ विचारणारे आहेत आणि बर्फीला, थंडगार चहा घुटकणारेही आहेत. बर्फ घालून चहाचं लाल पाणी पिणाऱ्या व्यक्ती बहुधा स्त्रिया असतात. त्या तोकडे कपडे घालून पोहण्याच्या तलावाजवळ किंवा समुद्रकाठी बसून हे कृत्य करतात आणि त्यांच्या चहाच्या ग्लासात नळी  आणि ग्लासच्या कडेवर लिंबाचा काप खोचलेला असतो; एवढेच मला ठाऊक आहे.
बघायला आलेल्या पाहुण्यांसमोर येणारा थरथरता चहा आहे, किटलीतून गिलासात झेपावणारा हापिसातला ‘च्या’ आहे, रेल्वेतला ‘च्याय ग्रेम’ आहे, नेमकं या द्रावणात आहे तरी काय अशा बुचकळ्यात पाडणारा पंचतारांकित ‘टी’ आहे आणि  या सर्वांहुनी निराळा असा इराण्याचा चहा आहे.    
अमृततुल्य चहा ही  मात्र वेगळीच संस्था आहे. मराठी भाषा आणि इये मराठीचीये  नगरीतील चहा वगळता दुसऱ्या कशाची अमृताशी तुलना झाल्याचं मला आठवत नाही. बाकी अमृत नावाचं एक अंजन आणि अमृत नावाची एक दारू मात्र आहे.    स्वर्गातही सध्या 'चहातुल्य अमृत मिळेल' अशा पाट्या आहेत म्हणे! तो अल्युमिनियमचा चबुतरा, ती  शेगडी, पैशाच्या ड्रॉव्हरवर बसलेला पायजमा आणि  बनियन घातलेला चहाकर्ता; त्याच्यामागे  असंख्य देवांच्या तसबिरी आणि "मैने उधार में बेचा", "गीता-सार" वगैरेचे स्टिकर, पाण्याच्या ग्लासात तरंगत तेवणारी ज्योत,  हे सारं प्रत्येक ठिकाणी जसंच्या तसं असतंच. शिवाय गिर्हाइकांसाठी 'प्रभात' आणि 'संध्यानंद' घेणंही यांना कायद्यानं बंधनकारक असावं. चहाकर्ता स्वतः पेपर कधीच वाचत नाही. चहा करण्यात तो अगदी गढलेला असतो. आधीच्या गिऱ्हाईकाचे पैसेही तो निव्वळ  कर्तव्यभावनेनं घेतो. इकडे आधण आलेले आहे आणि त्यानं त्यात चहा पावडर टाकलीसुद्धा. आता तो चहा उतू जायच्या आत मघाशीच खलून ठेवलेला मसाला तो किती चापल्यानं  घालतो ते  पहा. त्याच्या  हालचालीत एखाद्या सर्जनचा आत्मविश्वास आहे. ते पहा चहा ऊतू जातोय म्हटल्यावर त्यानं ओगराळं  पातेल्यात फिरवून चहा ढवळला सुद्धा. हाच तो क्षण जेंव्हा शेजारच्या पातेल्यातलं गरम दूध बरोब्बर मापानं चहात पडणार आहे, जादूगाराची  छडी फिरावी तसं पुनः ओगराळं फिरणार आहे आणि ते कशाय पेय सिद्ध होणार आहे.  इकडे किटल्या आणि त्यावर फडकी तयार आहेत. आता तो चहा गाळला आणि फडका चिमटयाने पिळला की बस्स. अशा चहाचा अमृतानुभव ज्यानं घेतला नाही तो चहाबाजच  नाही.
 काही मंडळी निव्वळ चहा पिण्याऐवजी त्यात काहीनाकाही बुचकळून बुचकळून खातात. हेही निषिद्ध समजायला हवं. खारी, मारी, केक, पोळी, क्रीमरोल वगैरे चहाच्या चवीला मारक आहेत. तुम्ही हे सारं आधी खा आणि वर नुसता चहा प्या. पण  वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी दोन्ही एकदम करू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे. मात्र या शिफारसीला एक अपवाद आहे. पहाटेपासूनची ड्यूटी असावी, श्वास घ्यालाही उसंत नसावी, नाष्टा,  जेवणाचे मुळी  भानच नसावे. मग कधीतरी उतरत्या संध्याकाळी जरा वेळ मिळावा. तहान, भूक, थकवा याची एकत्रित जाणीव व्हावी.   अशावेळी झक्कपैकी कपभर चहा आणि ग्लुकोज बिस्किटांचा अख्खा पुडा  घेऊन बसावे. चार बिस्किटे एकाच वेळी चहात बुडवावीत आणि चारीही एकदम खावीत. डोळे मिटावेत.  जीभ आणि टाळूमध्ये तो लगदा अलगद  दाबावा. मोक्ष मिळेल.


६ चहा


चहा
डॉ. शंतनू अभ्यंकर

चहा पोहे वरुन आठवलं, आमच्या एका मित्राकडे येणाऱ्याजाणाऱ्यांचं स्वागत करण्याची त्रीसूत्री होती,
पहिल्यांदा आलात तर पोहे आणि चहा,
दुसऱ्यांदा आलात तर नुसताच चहा
आणि तिसऱ्यांदा आलात तर फक्त  अहा!!                                                 
                                             
अर्थात हा प्रकार मला मात्र आवडत नाही. आल्यागेल्याला निव्वळ चहासुद्धा देण्याची माणुसकी असू नये म्हणजे फार झालं.
कल्पना करा, तुम्ही या मित्राकडे   चालला आहात. चांगली टळटळीत दुपार आहे. घड्याळात चहा वाजले आहेत. याच्याकडे होईलच या भरवशावर, तुम्ही घराचा चहा धुडकावून लावता आणि हा तुम्हाला नुसतंच 'अहा' म्हणून  कटवतो!! कसं वाटतं? चहा आणि अहा यमक जुळत असलं तरी चहाची जागा काही अहा घेऊ शकत नाही. चहा तो चहाच !
  आणि फक्त तोच चहा, की जो साग्रसंगीत तयार केला जातो आणि तितकाच तन्मयतेने प्यायला जातो. अशी रससिद्धी साधून जाणे हे साधं काम नाही. यासाठी आधी पाण्याला उकळी आली पाहिजे. नंतर साखर टाकली पाहिजे. साखरही कशी? वर कणभर जरी टाकली तरी जास्त होईल अशी. त्याच वेळी दुसऱ्या शेगडीवर दूध तापत असलं पाहिजे. चहा उकळल्यावर नंतर  दूध तापवलं तर दूध तापेपर्यत चहा गार होतो. साखर विरघळली की मगच  चहापावडर टाकायची. त्या फेसाळत्या पाण्यात त्या चहाचा अर्क छानपैकी उतरतो. तात्काळ गॅस बंद करून चहावर झाकण ठेऊन तो मुरू द्यावा. लोणचं मुरतं तसा चहा सुद्धा मुरतो बरं. आणि अट्टल चहाबाजांना चहा मुरला किंवा  नाही हे लगेच कळते. असो. आता दूध तापलं असेल. आता चहा गाळावा आणि त्यात दूधही गाळून घालावे. चहात साय घालणं हा फौजदारी गुन्हा ठरवला पाहिजे. चहा म्हणजे लस्सी नाही. सायीमुळे चहाची सगळी रयाच जाते. साय  नावाचा तो गिळगिळीत पदार्थ घुटक्या सरशी गिळणारी मंडळी पहिली की पट्टीच्या चहाबाजांच्या अंगावर शहारा येतो.  असो. तर अशा   रीतीने सिद्ध झालेला चहा आता गार होण्याच्या आत घुटके घेत घेत  संपवायचा आहे.
चहाचा वास वातावरणात दरवळ्यापासूनच खरंतर तुम्ही चहा प्यायला सुरुवात करता. मग कपबशांचा मंजूळ किणकीणाट कानी येतो आणि तो वाफाळता कप किंवा गिलास कलीजा  खलास करून जातो.   चहा समोर आल्यावर तुम्ही आधी नजरेने चहा पिता आणि मग जिभेनं. पहिल्याच घोटात ओठ आणि जीभ किंचित पोळायला हवी ! चहा बशीत ओतून, फुंकून, फुंकून, फुंकून गार करून पिणं म्हणजे सोळाव्या वर्षी लग्न करून शहाण्णवाव्या वर्षी संभोग करण्यासारखं आहे! चहा गरम नाही प्यायचा म्हणजे काय? म्हणे तोंड भाजतं म्हणे.  भाजलं तर भाजू देत. काही वेदना या सुखकर असतात हे या वया तरी   तुमच्या लक्षात यायला पाहिजे.
एकदा चहाचे तुम्ही रसिक चाहते बनलात की  मग तुम्हाला, 'घाईचा  चहा लागणं' म्हणजे काय हे कळेल, आणि नुसतंच "अहा" वर कटवणाऱ्या मित्राबद्दल मला एवढा राग का तेही कळेल.
बाकी या चहाची खुमारी काही औरच आहे. अगदी तस्साच केलेला चहा स्थलकालप्रसंगानुरूप वेगवेगळा लागतो हे मी अनुभवलं  आहे. सकाळच्या पहिल्या चहाबरोबर वर्तमानपत्राच्या कागदाचा वास हवा. शिवाय रविवार असेल तर चांगली जाडजूड पुरवणी हवी. या शिवाय त्या चहाला पूर्तता नाही. संध्याकाळच्या चहाआधी चांगली लांबलचक जबडाफाड जांभई हवी आणि आळोखेपिळोखे देत संपूर्ण शरीरावर्तनी आळस हवा.  पावसाळ्यात जर तुम्ही चहा पिणार असाल तर पाऊस धुवांधार बरसत असताना प्या. उगाच नळ गाळावा तसा पाऊस गळत असेल तर ती चहाची वेळच नाही.  धुवांधार पावसाबरोबर थंडी आणि धुकं असेल तर मग चहा प्यायल्यावर आभाळ ठेंगणं होत. थंडीतही चहाची खास वेळ आहे. हात पाय चांगले गार पडले, की  मग चहाकडे वळावं चहाच्याच कपानं  हात शेकत शेकत चहा प्यावा. थंडीत चहा कपानं पिता चांगले मोठे मग घ्यावेत. उन्हाळ्यात मात्र चहा थोडा थोडा आणि बऱ्याचदा प्यावा. अगदी बोळक्यानं किंवा बोंडल्यानं चहा प्यायलाही हरकत नाही. अर्थात पट्टीचे चहाबाज असतात त्यांना चहा कोणत्याही वेळी वर्ज्य नसतो. फक्त काही वेळा तो अधिक प्रिय असतो एवढंच.
(क्रमच: सॉरी क्रमशः)